Maharashtra Weather| ऊन पावसाचा खेळ, शेतकऱ्यांचा बसेना मेळ; पुढील चार दिवस पावसाचे, ‘या’ भागात कडक उन्हाचे
Maharashtra Weather| गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. काही भागात गारपीटही झाली. नाशिक मध्ये झालेल्या अवकाळीमुळे कित्येक संसार उद्ध्वस्त झाले. शेती आणि फळबागांची नासधूस झाली. आता पुन्हा एकदा हवामान विभागानं येल्लो अलर्ट जारी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीमागचा ताप काही कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीत. एका बाजूला उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला अवकाळी आणि गारपीट यामुळं शेतकरी त्रस्त आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
धुळे जिल्ह्यात पाठशिवणीचा खेळ
धुळे जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. मार्च महिन्यातही अवकाळीनं दाणादाण उडवली होती. यामध्ये एप्रिल महिन्यातही खंड पडलेला नाही. सततच्या अवकाळी पावसामुळं शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. धुळ्यात दिवसाचे तापमान हे 40 अंश सेल्सिअस असताना सायंकाळी तापमानाचा पारा खाली येतो आणि वादळी वाऱ्यासह येणाऱ्या अवकाळी पावसामुळं प्रचंड नुकसान होत आहे. अशा प्रकारची विचित्र परिस्थिती धुळे जिल्ह्यामध्ये आहे. या अवकाळी पावसामुळं फळबागांना मोठा फटका बसत आहे. तसेच जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याचे दरही अवकाळी पावसामुळं वाढत असल्याने शेतकऱ्यांचा मेळ बसत नसल्याचं पहायला मिळत आहे
राज्यातील तापमानात वाढ
राज्यात सर्वाधित तापमानाची नोंद पश्चिम महाराष्ट्रात झाली आहे. पाश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरात सर्वाधिक 40 अंश तापमान होते. परभणी, बीड, नांदेड, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा यवतमाळ इत्यादी शहरांच्या तापमानात वाढ होत आहे. राज्यातील अनेक शहरातील तापमान 40 अंश सेल्सियसच्या आसपास असताना शनिवारी मुंबईकरांना मात्र थोडासा आराम मिळाला. मुंबईचे तापमान 32.5 अंशावर होते.
कमी दाबाचा पट्टा
मध्य महाराष्ट्र ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र निर्माण झालं आहे. यामुळे राज्यात हवामानात आकस्मिक बदल झाला आहे. तेलंगणा ते दक्षिण तामिळनाडू पर्यंत हा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे हवेतील दमटपणा कमी झाला आहे. तसेच पुढील चार दिवस कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर या जिल्ह्यांना पुढील चार दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हेही वाचा:
- स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही शेतकऱ्यांच्या वाटेत चिखलच, ‘या’ जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांची परिस्थिती बिकट
- मे अखेर राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार दोन हजार रुपये, यासाठी काय करावं लागणार, वाचा सविस्तर
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..