Maharashtra Weather| शेतकऱ्यांच्या मागची पीडा टळेना, राज्यात पुन्हा एकदा येलो अलर्ट जारी, ‘या’ जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा
Maharashtra Weather| गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. काही भागात गारपीटही झाली. नाशिक मध्ये झालेल्या अवकाळीमुळे कित्येक संसार उद्ध्वस्त झाले. शेती आणि फळबागांची नासधूस झाली. आता पुन्हा एकदा हवामान विभागानं येल्लो अलर्ट जारी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीमागचा ताप काही कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीत. एका बाजूला उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला अवकाळी आणि गारपीट यामुळं शेतकरी त्रस्त आहेत. मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे या भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
वाचा: विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर
कमी दाबाचा पट्टा
मध्य महाराष्ट्र ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र निर्माण झालं आहे. यामुळे राज्यात हवामानात आकस्मिक बदल झाला आहे. तेलंगणा ते दक्षिण तामिळनाडू पर्यंत हा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे हवेतील दमटपणा कमी झाला आहे. तसेच पुढील चार दिवस कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर या जिल्ह्यांना पुढील पाच दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, कोकणात हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.
बुलढाणा आणि वाशिममध्ये गारपीट
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं हजेरी लावली. या भागात हरभऱ्या एवढ्या गारा पडल्याची माहिती आहे. यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. तसेच वाशिम मध्येही अनेक तालुक्यात वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. रिसोड तालुक्यात पडलेल्या गारांमुळे हळदीचं खूप नुकसान झालं आहे.
या जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा
राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांना पुढील पाच तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह, वादळ आणि गारपीट होण्याचीही शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहणं गरजेचं आहे. बदललेल्या वातावरणाचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. यातून आता मार्ग कसा काढायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
हेही वाचा:
- सरकारी कचेऱ्यांना वैतागलाय! काळजी करू नका, आता मोबाईलवरच मिळणार शेतीचे नकाशे
- चढ की उतार काय आहेत आज तूर ,सोयाबीन, अन् कांद्याचे ताजे बाजारभाव? त्वरित जाणून घ्या
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..