Panjabrao Dakh | राज्यात तीव्र उकाड्यासह तापमानात झपाट्याने वाढ होत असतानाच अनेक भागात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते, यंदा मान्सून 12 ते 13 जून दरम्यान महाराष्ट्रात दाखल होईल.
मागील वर्षी पाऊस कमी, यंदा समाधानकारक अपेक्षा:
मागील वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तर यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. पंजाबराव डख यांच्या मते, ज्या वर्षी उन्हाळ्यात कमी पाऊस पडतो त्या वर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस होतो. यंदा उन्हाळ्यात कमी पाऊस झाल्याने यावर्षी पावसाळा चांगला राहण्याची शक्यता आहे.
वाचा: सामन्यांना दरवाढीचा मोठा झटका! तूर डाळ आणि उडीद डाळीच्या दरात ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ
22 मे ला अंदमानमध्ये मान्सूनचे आगमन:
पंजाबराव डख यांच्या माहितीनुसार, यंदा 22 मे ला मान्सून अंदमानमध्ये दाखल होईल. तर महाराष्ट्रात ते 12 ते 13 जून दरम्यान आगमन करेल. मात्र, शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असलेला पेरणीयोग्य पाऊस 22 जूननंतरच सुरू होण्याची शक्यता आहे.
जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जोरदार पाऊस:
डख यांच्या अंदाजानुसार, जुलै महिन्यात राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर ऑगस्ट महिन्यात थोडा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पुन्हा जोरदार पाऊस होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
11 मे पर्यंत राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस:
राज्यात आधीच पूर्व-मान्सूनी पावसाची सुरुवात झाली आहे. पंजाबराव डख यांच्या म्हणण्यानुसार, आजपासून 11 मे पर्यंत राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात पूर्व विदर्भात गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
एकंदरीत, यंदा मान्सून चांगला राहण्याची शक्यता असल्याने राज्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा: वृषभ, सिंह आणि धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे भाग्याचा; मिळणारं आर्थिक लाभ अन् मोठी बातमी